विधान परिषदेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित !

महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला…भाजपच्या खात्यात किती जागा? शिंदेसेना- राष्ट्रवादीच्या नाराजीवर उतारा ?

मुंबई – महायुतीच्या जागा वाटपाचे भिजत घोंगडं हा चर्चेचा विषय ठरला होता. दिल्लीतही भाजप- शिंदे सेनेच्या वादावर तोडगा निघाला नसल्याचा दावा करण्यात येत होता. काही जागांवरून शिंदेसेना आणि भाजप खुट्टून बसल्याची चर्चा होती. अखेर ताज्या माहितीनुसार महायुतीचं घोडं अखेर गंगेत न्हालंय. महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. यामध्ये भाजपच्या वाट्याला किती जागा आल्या आणि मित्र पक्षांच्या झोळीत किती जागा पडल्या याची राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या एकूण 17 जागांवर निवडणूक होत आहे. येत्या महिन्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल. तर जागा वाटपावरून महायुतीमधील तीनही पक्षात ताळमेळ बसत नव्हता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळवल्याने या जागांवर भाजपचा वरचष्मा असेल हे निश्चित होते. भाजप हा मोठा भाऊ असला तरी आपल्या जागांचा दावा कमी होता कामा नये असे शिंदे सेनेचे धोरण समोर आले. जागा वाटपावरून पेच वाढला. आता जागा वाटपाचे निश्चित झाल्याचे मानले जात आहे. या जागा वाटपात भाजपला 10 जागा देण्याचे निश्चित झाल्याचे मानले जात आहे. सूत्रांनी याविषयीची माहिती दिली. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला किती जागा मिळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याविषयीची अपडेट लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

या ठिकाणी लढणार भाजप(सूत्रांची माहिती)

सोलापूर

अहिल्यानगर

जळगाव

सांगली

सातारा

नांदेड

वर्धा

चंद्रपूर-गडचिरोली

भंडारा -गोंदिया

या जागांवर लढणार शिवसेना

ठाणे

नाशिक

यवतमाळ

या जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात

पुणे

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग

तर संभाजीनगर, पुणे, जळगाव या जागांचा पेच कायम असल्याचे समजते. या जागांवर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी हक्क सोडण्यास नकार दिला आहे. तर जळगावमध्ये गुलाबराव पाटील हे मुलासाठी आग्रही आहेत. तर परभणी-हिंगोलीसाठी शिवसेनेचे नेते अर्जुनराव खोतकर यांनी जोर लावला आहे. तर इतर काही जागांवर सुद्धा नाराजी सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी पेपर सोपा वाटत असला तरी परिस्थिती कठीण झाल्याचे चित्र आहे. त्यावर महायुती काय तोडगा काढते याकडे सगळ्यांचे लक्ष लागेल आहे. भाजप समर्थक फडणवीस यांनी एक डाव हातचा ठेवल्याचे सूचक विधान केले आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत तरी जागा वाटपावर शिक्कामोर्तब होईल का याकडे इच्छुकांची बारीक नजर आहे. कारण अवघ्या दोन दिवसांनी अर्ज भरण्याची मुदत आहे.